पावसाळी कविता – ना. धों. महानोर

125.00 100.00

Fiction

Category:

Pawasali Kavita

ना. धों. महानोर यांच्या ‘पावसाळी कविता’ही ‘रानातल्या’च. त्यांच्यातही ‘वही’ प्रमाणेच लोकगीतांतील ओसंडणारे चैतन्य जाणवते. रानात रुजून, ‘मी माझ्या मुलखात नांदतो एश्वर्याचा राजा’ अशी आत्मविश्वासपूर्ण, मस्त लकेर घुमवत या कविता लिहिल्या आहेत.

झाडेपाखरे, ऋतुप्रहर हेही या मुलखाचे रहिवासी. त्यांच्याशी कवी उत्स्फूर्त संवाद साधतो. कधी या संवादाला भाषा असते, कधी नसते. महानोरांच्या कवितेतील स्त्रीलाही हा निःशब्द सहवास, संवाद आवडतो. तीही गाणे म्हणते ते ‘शब्दांशिवाय’चे. ही त्या मुलखाची जिवाला सुखावणारी अनोखी ‘हिरवी बोली’ आहे.

पण कधी कधी या कवितेतून जिवाला उदास करणारी मनोगतेही उमटतात. ‘मन माझे, अवसेचे विझलेल्या नवसाचे’ यांसारखे कवीचे उद्गार काळिमा पसरू लागतात. या विझलेपणाला कधी वैयक्तिक संदर्भ असतो, कधी तो खेड्यातील दैन्याच्या तीव्र जाणिवेतून आलेला असतो. पण या प्रकारचे उन्मळून टाकणारे अनुभव येत असतानाही कवीचे रानाशी, कवितेशी असलेले जन्माचे संबंध तुटत नाहीत. त्यामुळेच जुन्या स्मरणांनी जीव कासावीस झाला, खोट्या माणसांनी गाव गजबजले, गुदमरले, पीक करपले, पानगळ सुरू झाली तरीही कवीचे मन ओथंबलेलेच राहते, त्या अवस्थेत लिहिलेल्या कविता सहजपणे प्रादेशिकतेच्या कक्षा ओलांडून एका व्यापक क्षेत्राला भिडतात. एकदा कवीच्या आईने काळीज कापणारे, लक्तरलेले, जुन्या शब्दांचे गाणे म्हटले. कवीने ते ऐकले. ती पुण्याई महानोरांच्या शब्दांनी सायीसारखी जपली. कवितांत, ‘पळसखेड्या’च्या गाण्यांत आणि ‘जैत’च्या गाण्यांत. मनाच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या लोकगीतांच्या मुक्त, लयबद्ध लकेरीचे पडसाद महानोरांच्या कवितेत ऐकू येतात ते यामुळेच. ती कविता ‘माल्हन’ होते आणि मग कवीप्रमाणे वाचकही रानभरी होऊन, ‘गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी’ अशा अवस्थेत, शब्दस्पर्शरूपरसगंधाच्या पावसात निथळत उभा राहतो.

ISBN: 978-81-7185-725-8

No. of Pages: 68

Year of Publication: 1982

Weight 0.13 kg