Narayan Surve (नारायण सुर्वे) : Navya Mansache Agaman (नव्या माणसाचे आगमन)
नारायण सुर्वे यांच्या कवितेमुळे मराठी कविता पुन्हा एकदा जीवनाकडे वास्तव जीवनाकडे वळली, सामान्य माणसांच्या सुखदुःखांकडे वळली हे या कवितेचे श्रेय आहे. कवितेतील अनुभवांचे संकेत या कवितेने पुन्हा एकदा मोडून टाकले.
कष्टकऱ्यांच्या जीवनातील भावना, त्यांची स्वप्ने, त्यांच्या जीवनातील काव्य या कवितेने व्यक्त केले. अनेक दाहक वास्तव अनुभव सुर्वे यांच्या कवितेमुळे काव्यरूप पावले. सूक्ष्म व तरल अनुभवच काव्यरूप घेऊ शकतो, ही कल्पना रूढ होत असताना सुर्वे यांनी आपल्या कवितेमधून दणकट अनुभवविश्व साकार केले.
वैफल्याशिवाय कवितेला खरी कलात्मकताच प्राप्त होत नाही अशी समजूत रूढ होण्याच्या काळात आशावादी कविता लिहून आपले वेगळेपण सुर्वे यांच्या कवितेने लक्षात आणून दिले. कवितेच्या अनुभवाचा, भाषेचा जो तोच तो किरटेपणा मराठी कवितेत जाणवू लागला होता, त्याला सुर्वे यांच्या कवितेने एक धक्का दिला. सुर्वे यांच्या या अशा कवितेमुळे मराठी कविता पुन्हा एकदा मोकळी झाली. संकेतांनी जखडल्या जाणाऱ्या, जडत्व पावणाऱ्या मराठी कवितेला मुक्त करणे हे मराठी कवितेच्या संदर्भात सुर्वे यांच्या कवितेचे श्रेय आहे.
– दिगंबर पाध्ये
Paperback
ISBN : 978-81-7185-403-5
Number of pages : 80
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Year of Publication : Published 2025