करुणाष्टके / प्राजक्त देशमुख (Karunashtake / Prajakt Deshmukh)
बायकांचा सामाजिक इतिहास हा पुरुषांच्या वैयक्तिक गंडांचा इतिहास आहे. पुरुषांमधल्या टोकाच्या असुरक्षिततेतून जन्म घेणाऱ्या हिंसेची ती कहाणी आहे. हा इतिहास, पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्वतःचं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी, पीडित स्त्रियांपैकीच काही जणींनी अन्यायाचं वाहक होणं पसंत केल्याचा वर्तमान आहे.
‘करुणाष्टके’ ह्या सगळ्या आणि इतरही अनेक कंगोऱ्यांचा प्रभावशाली रंगाविष्कार आहे.
‘करुणाष्टके’ वाचताना नाटकाच्या विषयामुळे मन अस्वस्थ होतं आणि त्याचवेळी त्याच्या उत्कृष्ट नाट्यमय मांडणीमुळे प्रभावितही होत राहतं. ह्या नाटकाची वाचनीयता शब्दागणिक लेखकाचं म्हणणं पोहोचवत राहतेच, पण त्याचवेळी सातत्याने त्याच्या रंगमंचीय आविष्काराबद्दलची उत्सुकता खुलवत ठेवते. आणि हे एका यशस्वी नाट्यलेखनाचं वैशिष्ट्य आहे.
प्रत्येकाची ठाशीव अशी एक खाजगी गोष्ट असलेली अनेक पात्रं ह्या संहितेत आहेत; पण असं असूनसुद्धा एक सार्वत्रिक कैफियत आपल्यापुढे येत राहते आणि सरतेशेवटी ती कैफियत निर्माण करणाऱ्या रुढींना दिलेल्या आव्हानाचं सामूहिकीकरणसुद्धा नाटकात तितक्याच समर्थपणे होतं.
आपलं वर्तमान सुधारण्यासाठी, गैरसोयीच्या वाटणाऱ्या इतिहासाची समाजाला आठवण करून देणं; हे कलेच्या कर्तव्यांपैकी एक आहे. ‘करुणाष्टके’ ते कर्तव्य शांतपणे, पण ठामपणे बजावतं.
— अतुल कुलकर्णी
(राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने-नाट्य अभिनेते)





