Pawasat Surya Shodhanari Manase (पावसात सूर्य शोधणारी माणसं) – Neeraja (नीरजा)
“जे दर्पणी बिंबले’ आणि ‘ओल हरवलेली माती’ या कथासंग्रहानंतरचा ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ हा नीरजाचा नवा कथासंग्रह. २००५ ते २००७ या काळात लिहिलेल्या दहा कथांचा हा संग्रह आहे.”
नीरजा यांच्या कथा मूलतः स्त्रीलक्ष्यी आहेत. मानवी नात्याचे सूक्ष्म कंगोरे शोधताना विवाहसंबंधातील विसंवादाची विविध रूपे चित्रित करताना दोन माणसांचे नाते एका भवतालात घडत बिघडत असते याचे भान लेखिकेला आहे. पण यातील स्त्री नात्याच्या भोवऱ्यातही आपली पावले घट्ट रोवून उभी राहण्याचा यत्न करते. लेखिकेला स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची तीव्र जाणीव आहे, पण अपेक्षाभंगाचे दुःख स्त्रीपुरुष दोघांनाही आहे याचे भान आहे! खलत्व असणाऱ्या आक्रमक पात्रांविषयी तिला करुणा वाटते.
स्त्री-पुरुष नाते देहमनाचे आहे, त्यात कधी शरीर, नात्याचे आविष्करण करणारे तरल वाद्य होते, तर कधी ते आक्रमक प्रसंगी हिंस्र शस्त्र होते. या साऱ्यात गुंतलेली पात्रे नीरजा कथेत येतात त्या चित्रणात लेखिका व्यंजकतेचा, प्रसंगी नर्मविनोदाचा वापर करते.
नीरजा आजची कथालेखिका आहे. त्यामुळे अनुभव स्वाभाविकपणे भिन्न कथारूपे, निवेदनशैली, शोधत जातो. ‘सुशांतचा सोळावा वाढदिवस’ वा ‘गुरुचरित’ या कथांचे यासंदर्भात वाचन करता येईल.
नीरजा यांच्या कथांत महानगरीय जीवनाच्या वेगआवेगाची जाणीव अनेकदा शैलीच्या गतीतून, लयीतून व्यक्त होते. दीर्घकथेचा स्वभाव नसणाऱ्या काही दीर्घ होताना दिसतात. पण लेखिकेची लेखनांर्तगत एकाग्रता अशी आहे की निवेदन ‘भटकत’ नाही. तसेच निवेदनातील संदर्भसंपन्नता जड होत नाही.
कवयित्री म्हणून समकालीन मराठी कवितेवर नीरजाची मोहोर आहेच. पण गेल्या काही वर्षांतील त्यांच्या अनुभवसापेक्ष कथारूपे शोधणाऱ्या कथेने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
– पुष्पा भावे
ISBN: 978-81-7185-560-5
Number of pages: 210
Language: Marathi
Year of Publication: 1st Ed. 3rd Reprint 2024