Tatpoorvi
‘तत्पूर्वी’ या संग्रहातल्या कवितांना स्वतःचा असा एक चेहरा आहे, आणि तो आहे वर्तमानाचा. संवेदनशीलता आणि चिंतनशीलता, अचूक शब्दयोजना आणि नेटक्या प्रतिमा, वर्तमानाचे नेटके भान आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, वाचकाला सहज कवेत घेणारी लय आणि आशयाची टोकदार मांडणी अशी काही वैशिष्ट्ये त्यांच्या या संग्रहातील कवितांची सांगता येतील. कवीच्या मनात असलेले काळाचे आणि त्याच्या शक्तीचे भान या कवितांतून ठळकपणे जाणवते.
आज महानगरांत, शहरांत, गावांत, खेड्यांत राहणारा माणूस कोणकोणत्या मनोवस्थांतून जात आहे याचे चित्रण दासू वैद्य अतिशय समर्पक पद्धतीने करतात. आधुनिकतेच्या झुली पंघारताना जात आणि धर्म यांच्या अदृश्य भिंती समाजात केवळ उभ्या राहत नाहीत तर बळकटही होत आहेत याविषयीचा खेद दासूच्या अनेक कवितांतून व्यक्त होतो. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात माणसांच्या नात्यांत आलेला यांत्रिकपणा, कोणाही सुसंस्कृत माणसाच्या मनाला वेदना देणाऱ्या कृती आणि उक्ती यात तफावत आढळणाऱ्या ज्या अनेक घटना भोवती घडताना दिसतात त्यांवर दासू वैद्य यांनी भाष्य केले आहे. थोडक्यात, दासू वैद्य यांचा हा कवितासंग्रह वर्तमानाचे भान देतानाच वाचकाला विचारप्रवृत्त करणारा आहे.
ISBN: 978-81-7185-498-1
No. of pages: 125
Year of publication: 2014