सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा निग्रह करणाऱ्या पोलीस दलातील एक संवेदनशील चेहरा म्हणजे आयपीएस
गजानन राजमाने. त्यांच्या ‘खांद्यावरचे स्टार्स’ या पुस्तकातून गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन, नक्षलवाद्यांना मुख्य
प्रवाहात आणण्याचे प्रयत्न आणि खाकी वर्दीतील माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन घडते.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा निग्रह हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य केवळ
शब्द नसून एक सजिवंत प्रेरणा आहे. हे वाक्य वाचल्याक्षणी सर्वसामान्यांच्या मनात पोलीस दलाविषयी जो आदर,
विश्वास आणि सुरक्षिततेचा भाव निर्माण होतो, तो अगदी नितळ आणि प्रामाणिक असतो. या ब्रीदवाक्यातील
अर्थाला प्रत्यक्ष कृतीतून सार्थ करणारे काही अधिकारी आपल्या कर्तृत्वाने लोकांच्या मनाचा ठाव घेतात; त्यापैकीच
एक नाव म्हणजे गजानन राजमाने.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील बनपुरी या छोट्याशा खेडेगावातून, संस्कारसंपन्न मातीतून
लेखकाचा घडलेला पिंड. राजमाने यांनी आपल्या सेवाप्रवासात महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक
वैविध्यपूर्ण भागांत काम केले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सातारा आणि नागपूर
शहरे. प्रत्येक प्रदेशाच्या वेगळ्या समस्या, वेगवेगळे सामाजिक ढंग आणि भिन्न आव्हाने त्यांच्या सेवाजीवनात
सामोरे आली. त्या प्रत्येक अनुभवाची नोंद त्यांनी केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, मनापासून
समाजाशी जोडलेला माणूस म्हणून ‘खांद्यावरचे स्टार्स’ या आत्मपर लेखसंग्रहात शब्दबद्ध केली आहे.
राजमाने यांच्या लेखनाची लक्षवेधी गोष्ट म्हणजे पोलीस अधिकारी म्हणून वागणे आणि माणूस म्हणून जगणे
यामधील अदृश्य, पण अत्यंत महत्त्वाचा सेतू त्यांनी आपल्या कृतीतून उभा केला आहे. केवळ कर्तव्य पार पाडणे हा
त्यांचा हेतू नव्हता; तर माणुसकीची ज्योत सतत तेवत ठेवणे, कुठेही अमानुषतेचा अंधार दाटू नये, यासाठी त्यांचा
सातत्यपूर्ण प्रयत्न होता. ‘आत्मसमर्पण’ या लेखामध्ये याचे प्रभावी दर्शन होते. नक्षलवादाच्या दुष्टचक्रात
अडकलेल्या दिलेर या तरुणाला आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न लेखकाने केला. दिलेरला
शिक्षणाच्या मार्गावर आणणे, पुढे वैचारिक दारिद्र्यातून बाहेर काढून त्याच्या जीवनात लोकशाहीचा दीप प्रज्वलीत
करणे हे सर्व राजमाने यांच्यासाठी फक्त एक प्रकरण नव्हते, तर एका मानवाचा अंधारातून प्रकाशाकडे प्रवास
घडवण्याची कर्तव्यनिष्ठ, पण हृदयस्पर्शी कृती होती. एका नक्षलवाद्याने पोलीस दलात सामील होणे ही परिवर्तनाची
सर्वोच्च पायरी आहे.
गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेल्या निष्पाप लोकांची सुटका करणे, त्यांना निर्भय करणे आणि समाजात पुन्हा उभे
राहण्यासाठी सामर्थ्य बहाल करणे हे पोलीस दलाचे मूलभूत आणि पवित्र कर्तव्य. ही वर्दी ते केवळ नोकरी म्हणून
नव्हे, तर भाग्य आणि जबाबदारी म्हणून स्वीकारतात. मालेगाव परिसरातील ‘भवानी दादा’सारखा दहा-पंधरा गंभीर
गुन्ह्यांमध्ये नोंद असलेला क्रूर गुन्हेगारही अशा कर्तव्यनिष्ठ अधिकार्यांपुढे नरमतो. गांजा आणि मादक
पदार्थांच्या नशेत हिंस्त्र पशूप्रमाणे वागणारा हा माणूस समाजासाठी एक भयाण प्रतिमा बनला होता. परंतु गजानन
राजमाने यांच्यासारख्या संवेदनशील अधिकार्याने त्याच्याशी हातोड्याच्या ठोक्याने नव्हे, तर माणुसकीने संवाद
साधला. धर्मग्रंथातील कथा, सद्विचार आणि जीवनमूल्ये यांच्या माध्यमातून त्यांनी भवानी दादाच्या अंतर्मनात
दडलेला माणूस हलकेच जागवला.
राजमाने हे गुन्हेगार पाहताना केवळ त्यांच्या गुन्ह्यांचाच विचार करत नाहीत; तर त्यांच्या मनात आयुष्याने
केलेल्या जखमा, त्यामागची वेदना आणि चुकांपलीकडील चांगुलपणाची क्षीण ज्योत पाहण्याचा प्रयत्न करतात.
म्हणूनच ते आजान आणि आरतीमधील विभाजन मिटवण्याचा प्रयत्न करतात. समाजाच्या उपेक्षित, निराधार
मुलांसोबत ते स्वत:च्या मुलीचा वाढदिवस साजरा करतात; त्या वेळी त्यांनी केलेली धर्माची व्याख्या अत्यंत हृदयात
उतरणारी आहे.
धर्माच्या पलीकडे जाऊन ‘माणसांमधला माणूस’ शोधण्याचा हा दृष्टिकोन राजमाने यांना विशेषत्व देतो. पुस्तक
वाचताना एक संवेदनशील पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होत जाते. पुस्तकातला एक हृदयस्पर्शी प्रसंग
म्हणजे एका वयोवृद्ध होमगार्डला केलेला आदरपूर्वक सॅल्यूट. त्या होमगार्डमध्ये त्यांना स्वत:च्या वडिलांचे प्रतिबिंब
दिसले. त्यांच्या वडिलांनी दारूचे व्यसन सोडून कुटुंबाचे आयुष्य उजळवले, त्याची कृतज्ञता लेखकाने इतक्या
भावनिक आणि सच्च्या पद्धतीने व्यक्त केली आहे की वाचकही भारावून जातो. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर
गंध लावून वर्तमानपत्र वाचत बसलेल्या एके काळच्या होमगार्डला युनिफॉर्मवर ऑफिसला निघताना पोलीस
अधीक्षक पुत्र ‘प्रणाम’ करतो. हा प्रणाम केवळ वडिलांना नव्हता, तो भारताच्या खर्या श्रमवीराला आणि सेवाभावाला
होता.
‘तिला आयपीएस बनायचं आहे’ या लेखात लेखकाची संवेदनशीलता अधिक ठळकपणे दिसून येते. वेश्या
व्यवसायाच्या अंधारात वाढलेली निकिता- जिने बारावीला ८२ टक्के गुण मिळवले आणि आय.पी. एस. होण्याचे
स्वप्न पाहिले. तिची कहाणी समाजातील दोन टोकांचे चित्र स्पष्ट करते. एकीकडे दुष्ट प्रवृत्तीचे रमेश शिंदेसारखे
लोक, तर दुसरीकडे तिचे भविष्य उभे करण्यासाठी पुढे सरसावणारी सज्जन माणसे.
बालमित्र शहीद जवान विष्णू पुकळेची आठवण त्यांनी ज्या तळमळीने मांडली, त्यामुळे हे पुस्तक फक्त आत्मकथन
राहत नाही तर ते सैनिकांच्या बलिदानाने उजळलेले राष्ट्रभक्तीचे जिवंत दस्तऐवज बनते. हे पुस्तक मानवतावादी
पोलीस अधिकार्याच्या अंतरंगात डोकावणार्या, समाजासाठी जिव्हाळ्याने झटणार्या व्यक्तिमत्त्वाचा उज्ज्वल
आरसा आहे. हे पुस्तक केवळ अनुभवांचे वर्णन नाही; तर मानवी मूल्यांच्या शोधाचा, संवेदनशीलतेचा आणि
सामाजिक जबाबदारीचा एक प्रमाणभूत आत्मपर प्रवास आहे. हे पुस्तक वाचताना पोलीस दलाबद्दलची
सामान्यजनांची पारंपरिक धारणा पूर्णपणे बदलून जाते. खाकी वर्दी म्हणजे कठोरता, भीती आणि कडक शिस्त
असाच आपला समज, पण राजमाने यांच्या लेखनातून दिसणारा पोलीस अधिकारी हा केवळ नियमपालक नाही; तो
माणुसकी आणि समाजाप्रती आत्मीयता असणारा दूत आहे.
नक्षलवादाने ग्रासलेल्या भागांत उभ्या राहिलेल्या भीतीच्या भिंती तोडणे हे अत्यंत कठीण काम. पण राजमाने यांनी
‘दीपस्तंभ’ या उपक्रमाद्वारे अशा भागात शिक्षणाचा प्रकाश नेला. स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी केवळ शैक्षणिक
नाही; ती तरुणांच्या मनात भीतीऐवजी भविष्याची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पिपरखारी’ आणि
‘बंदुकीशिवाय नक्षल बीमोड’ हे लेख तर पोलिसांच्या असामान्य धैर्याचे द्योतक आहेत. मीनाक्षी नावाच्या हुशार, पण
व्यसनाधीन मुलीचा प्रसंग पुस्तकातील अत्यंत प्रभावी अनुभवांपैकी एक आहे.
‘खांद्यावरचे स्टार्स’ हे पुस्तक पोलीस दलातील माणुसकीची अर्थपूर्ण परंपरा पुढे नेणारा अनुभवसंग्रह आहे. खाकी
वर्दीतली माणुसकी, धैर्य, करुणा आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर चित्रण या पुस्तकातून दिसते. प्रत्येक लेख
एका वेगळ्या भावविश्वाची दारे उघडतो. कधी दु:ख, कधी प्रेरणा, कधी धैर्य, तर कधी माणुसकीचा अखंड प्रवाह.
राजमाने यांच्या लेखनातील स्वच्छ, मनातील निर्मळ भावना आणि समाजासाठी असलेली आंतरिक ओढ हीच या
पुस्तकाची मुख्य शक्ती आहे. राजमाने यांच्या व्यक्तिमत्त्वात ‘माणूसपण’ हा मूळ गाभा आहे आणि तो त्यांच्या
लेखनातून सहजपणे उलगडतो. हे पुस्तक केवळ पोलिसी जीवनाचे वर्णन नसून मानवी मूल्यांचे जतन, आत्मसंघर्ष,
कर्तव्यशीलता, संवेदनशीलता आणि जगण्याच्या अर्थाचा वेध घेणारी एक साहित्यिक कलाकृती आहे.
श्रीकृष्ण पडळकर
(हा लेख दैनिक लोकसत्ता, लोकरंग पुरवणीत दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित झाला आहे.)

खांद्यावरचे स्टार्स – गजानन शिवलिंग राजमाने
Non-Fiction